मुंबई, दि. १३ : कोरोनामुळे झालेले स्थलांतर, गमावलेले रोजगार यामुळे मोठ्या संख्येनं मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या मुलांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत.
यंदाचं शैक्षणिक वर्ष ऑनलाइन वर्गात गेलं. अनेक विद्यार्थी ऑनलाइन वर्गाचा लाभ घेवू शकलेले नाहीत. राज्यातील पहिली ते आठवीच्या जवळपास १८ टक्के विद्यार्थ्यांशी गेल्या अनेक महिन्यात शिक्षकांचा संपर्कसुद्धा होऊ शकलेला नाही. राज्याच्या शिक्षण विभागाची ही आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. कुटुंबं शहराकडून गावाकडे, परराज्यातही स्थलांतरीत झाली आहेत. या सगळ्या परिस्थितीत मुळातच राज्यात गेली काही वर्षे सातत्यानं दिसणारा शाळाबाह्य़ मुलांचा प्रश्न यंदा अधिकच गंभाीर होण्याची शक्यता आहे.
युनेस्कोनंही १८० देशांतील जवळपास अडीच कोटी मुलं नव्यानं शिक्षण प्रवाहाबाहेर फेकली जातील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर आता घरोघरी जाऊन शाळाबाह्य़ मुले शोधण्याची मोहीम सुरू करण्याची सूचना केंद्रानं दिली आहे. यानुसार घरोघरी जाऊन ६ ते १८ वयोगटातील मुलांची नोंद घ्यायची आहे. शाळा बंद असताना झालेलं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी उपाय योजण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
काय आहेत या सूचना.?
- शाळाबाह्य़ मुलं शोधून त्यांना स्वयंसेवी संस्था, स्थानिक शिक्षक यांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात यावं.
- अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
- शाळा प्रवेशासाठी विशेष अभियान, प्रवेशोत्सव असे कार्यक्रम राबविण्यात यावेत.
- कोरोना होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी, याची माहिती पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात यावी.
- शालेय साहित्य, पोषण आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा.